अतिवृष्टी नुकसानीची शेतकऱ्यांनी भरपाईसाठी पीक विमा कंपनीस तात्काळ माहिती कळवावी – जिल्‍हाधिकारी डॉ.इटनकर

कृषी

नांदेड,बातमी24:-मागील दोन दिवसांपासून अनेक भागात अतिवृष्‍टी झाली आहे. त्‍यामुळे नदी नाल्‍यांना पूर येऊन शेती क्षेत्राचे नुकसान होण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. अशावेळी विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळणेसाठी झालेल्‍या नुकसानीची पुर्वसुचना संबंधीत विमा कंपनीस 72 तासामध्‍ये कळवावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्‍यास, भुस्‍खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या नैसर्गिक आपत्‍तीमुळे नुकसानग्रस्‍त झाल्‍यामुळे होणारे अधिसुचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्‍तरावर पंचनामे करुन निश्चित करण्‍यात येते. या जोखीमेंतर्गत शेताचे क्षेत्र पडलेल्‍या पावसामुळे पाण्‍याची पातळी वाढून किंवा ओसंडून वाहणारी विहिर किंवा पुराचे पाणी शेतात शिरुन, शेत दिर्घकाळ जलमय राहिल्‍यामुळे शेती क्षेत्राचे नुकसान झाल्‍यास विमा कंपनीकडे नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो.

विमा दावा मंजूर होण्यासाठी झालेल्‍या पीक नुकसानीची माहिती / पुर्वसुचना कंपनीस देणे गरजेचे आहे. त्‍यासाठी पीक विमा धारक शेतकऱ्यांनी गुगल प्‍ले स्‍टोअर वरुन Crop Insurance  हे अॅप डाउनलोड करुन त्‍यामध्‍ये आपल्‍या नुकसानीची माहिती भरावी किंवा 18001035490 या टोल फ्री क्रमांकावर किंवा [email protected] या पत्‍यावर ई-मेलवर नुकसानीची पुर्वसुचना दयावी किंवा कृषी विभाग व महसूल विभागास याबाबत माहिती कळवावी, असेही आवाहन केले आहे.