जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे अफवांवर विश्वास न करण्याचे आवाहन

नांदेड

नांदेड,बातमी24: ट्रक चालकांनी घेतलेली भूमिका लक्षात घेऊन डिझेल व पेट्रोलचा तुटवडा निर्माण होईल या भितीपोटीने काही वाहनचालकात संम्रभ दिसून येत आहे. अनेक वाहनचालक आवश्यकतेपेक्षा जास्त पेट्रोल व डिझेल भरतांना दिसून येत आहे. याबाबत पेट्रोलपंप चालकांकडून आढावा घेतला असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा जिल्ह्यात नाही, हे स्पष्ट झाले आहे.

जिल्हाधिकारी राऊत यांनी मंगळवार दि.2 जानेवारी रोजी जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालक-मालक व पेट्रोल कंपनी चालकांची बैठक घेतली.यामध्ये जिल्ह्यात आठ दिवस पुरेल इतका साठा शिल्लक असून तूर्त काळजी न करण्याचे कारण असल्याचा विश्वास देण्यात आला आहे.त्यामुळे लागलीच तुटवडा निर्माण होईल अशी परिस्थिती नसून आवश्यक लागेल तितकेच डिझेल व पेट्रोल भरून घ्यावे, अनावश्यक गर्दी न करण्याचे आवाहन राऊत यांनी केले.

यावेळी जनतेला उद्देशून राऊत यांनी एक व्हिडिओ सादर केला, असून यामध्ये ते म्हणाले, की सर्व वाहनधारकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या गरजेएवढेच नेहमीप्रमाणे पेट्रोल व डिझेल घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.जिल्ह्यात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यादृष्टिने जिल्हा प्रशासन व पोलीस विभाग दक्ष आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.