डिजीटल माध्यमांना पुढील काळात मोठी उपलब्धताःगणेश रामदासी

महाराष्ट्र

 

नांदेड, बातमी24ः सध्याचे युग हे डिजिटल माध्यमांना वाव देणारे आहे. पुढील काळात डिजिटल माध्यमांचे वर्चस्व राहणार आहे. मात्र या क्षेत्रात काम करणार्‍यांनी सजगपणे आपले कार्य केले तर मोठी उपलब्धता असेल असे मत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयचे मराठवाडा संचालक गणेश रामदासी यांनी व्यक्त केले.

गणेश रामदासी हे नांदेड दौर्‍यावर आले असता, बातमी24.कॉमने त्यांच्याशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले, की माहिती तंत्रज्ञानाने मोठी प्रगती साधली आहे. या माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग माहिती प्रसारणाच्या क्षेत्रात होत असून यास डिजिटल युग म्हणले जात आहे. प्रसार माध्यम क्षेत्रात डिजिटल माध्यमे स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.हा बद्दल स्वीकार्य असला,तरी प्रत्यक्ष काम करणार्‍यांनी बातमीची सत्यता पडताळणी केल्याशिवाय शेअर करणे धोक्याचे ठरू शकते, असे सांगण्यात ते विसरले नाही.

वेब पोर्टल व युटयूब वाहिन्यांच्या बाबत मॉनिटरींग व अक्रिडिटेशनची सुविधा आजघडिला नाही, प्रत्यक्षात नियमात तरतूद नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे वेब पोर्टल व युटयूब वाहिन्यांनी या क्षेत्रात जबाबदारीने वार्तांकन करणे महत्वाचे आहे. बातम्यांचे शेअरींग करण्यापूर्वी सत्यता/पडताळणी करणे आवश्यक आहे. याकडे लक्ष दिल्यास डिजिटल माध्यमांना पुढील काळात मोठा वाव मिळू शकतो, असे गणेश रामदासी यांनी सांगितले.

विपर्यास करण्याचा प्रयत्नः-रामदासी
बीड येथील वसंतराव काळे पत्रकारिता व संगणक शास्त्र महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत प्रमुख वक्ता म्हणून मी बोलत असताना भविष्यात वृत्तपत्रांचा कस लागणार असून त्यासाठी मुल्यवर्धनाची आवश्यकता आहे. वृत्तपत्रांना डिजिटल माध्यमांमधील नव माहिती तंत्रज्ञान स्विकारावे लागणार याबाबत मार्गदर्शन केले आहे. यात कुठेही कोणत्याही माध्यमांना अनाधिकृत ठरविण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र काही वेब पोर्टल व युटयूब वाहिन्यांनी माझ्या भाषणाचा अर्थ चुकीच्या पद्धतीने लावण्याचा प्रयत्न केला गेला. या संदर्भाने बीड जिल्हा माहिती कार्यालयाने चुकीचे वृत्त प्रसारित केल्यावरून खुलासा मागविला होता. तरीही जाणीवपूर्वक यात माझी बदनामी करण्याचा प्रयत्न चालविला जात असल्याबद्दल रामदासी यांनी खंत व्यक्त करत वेब पोर्टल व युट्युब वाहिन्यांनी दृकश्राव्य माध्यमप्रमाणे संकेत जपावे,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली,जेणेकरून कोणत्या ही विधानाचा विपर्यास केला जाणार नसल्याचे रामदासी यांनी नमूद केले.