खंडणीगँग, बंदुक आणि गोळीबार… राजकीय उदासिनता की, पोलिसांची हतबलता

महाराष्ट्र

खंडणीगँग, बंदुक आणि गोळीबार…
राजकीय उदासिनता की, पोलिसांची हतबलता
जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24ः मागच्या चार ते पाच वर्षांपासून बंदुकीच्या धाकावर लुटमार व गोळीबाराच्या घटनांनी शहरातील व्यापार्‍यांच्या नाकीदम आणला आहे. बहुतांशी व्यापारी हे जीव मुठीत घेऊन व्यवसाय चालवित आहेत. असे प्रकार थांबण्याऐवजी ते दिवसेंदिवस वाढत असल्याने सामान्य माणसाचाही जीव सुद्धा या गोळीबाराच्या प्रकारामुळे गुदमरत आहे. या सगळया प्रकारास राजकीय उदासिनतेसह पोलिसांची हतबलता सुद्धा पुढे आली आहे.


मागच्या महिनाभराच्या काळात बंदुकीच्या धाकावर खंडणी उकळणार्‍या शांत झाल्यासारखे चित्र होते. मात्र रविवार दि. 4 रोजी जुना मोंढा परिसरातील टॉवर भागात तीन दुचाकीवर आलेल्या गुंडाच्या गँगने अंदाधुंदने गोळीबार करत एका टपरी चालकावर गोळी चालविली. ही खंडणीगँग इतक्यावर न थांबता चार दुकानांवरही गोळीबार करत एका दुकानातील दहा हजार रुपये लांबवित पसार झाले. या घटनेमुळे नांदेड शहरात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

नांदेड शहरात असे गोळीबार करून व्यापार्‍यांना धमकावण्याचे प्रकार नवीन नाहीत. अनेक व्यापार्‍यांना गोळया मारून जायबंदी केल्याचे प्रकार नांदेडकरांना ठावूक आहेत. अशा गँगवारमधून अंतर्गत खुनाच्या घटना सुद्धा मागच्या काही वर्षांमध्ये घडल्याचे बघायला मिळतात. अशा गँगवार वाढण्याचे कारण म्हणजे, शहरात अवैध शस्त्राचे बनत चालले कोठार यास प्रामुख्याने कारणीभूत ठरत आहे. शोध घेतल्यास शेकडयांमध्ये गावठीसह इतर प्रकारच्या बंदुका मिळून जातील.

या प्रकाराची पोलिसांना सुद्धा जाणीव आहे. परंतु सापडला तोच चोर असे पोलिसांचे सुरु आहे. बंदुका सहजपणे उपलब्ध होत असल्याने गुंडगर्दी सुद्धा तितकीच वाढत चालली, असून थांबण्याचे नाव घेत नाही. एखाद्या घटनेत एक गँग ताब्यात घेतली, की दुसरी गँग तयार होते. अशा गँग गल्ली-बोळात उदयास येत आहे. अशा गँग संपविण्याचे आव्हान पोलिसांना जड जात आहे.

नांदेड शहराची बदनामी थांबवायची असेल, तर शहरात वाढत चालेला गँगवार थांबविण्याचे राजकीय पक्षांनी सुद्धा पुढे येणे आवश्यक आहे. पोलिसांना बळ देण्याचे काम येथील लोकप्रतिनिधींना सुद्धा करावे लागणार आहे. पूर्वी बिहारमधील गुंडराजची चर्चा देशभर होत होती.तशी चर्चा नांदेडमधील खंडणीगँगची राज्यभरात व्हायला वेळ लागणार नाही. याला न थांबविल्यास पुढील निवडणुकांमधील विकासाच्या मुद्दांपेक्षा दहशत माजविणार्‍या गँगचा मुद्दा अजेडयांवर आलेला असेल.