रब्बी हंगामात अखंडीत वीजपुरवठा सुरू राहणार:-डॉ.राऊत

महाराष्ट्र

 

मुंबई, बातमी24 : –
येत्या रब्बी हंगामात प्रामुख्याने कृषिपंपांना अखंडित वीजपुरवठा होईल, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी दिली. राज्याचे वीजक्षेत्र सध्या प्रतिकूल परिस्थितीत विविध संकटांना सामोरे जात असले तरी सुरळीत वीजपुरवठा आणि ग्राहकसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नाही याबाबत कायम दक्षता घ्यावी,असे आवाहनही ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी केले.

ऊर्जामंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर महावितरण व महानिर्मिती या कंपन्यांचे मुख्यालय असलेल्या मुंबई येथील प्रकाशगडला ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी पहिल्यांदा भेट दिली. या भेटी दरम्यान प्रकाशगड येथे आयोजित बैठकीत परतीच्या पावसामुळे राज्याच्या काही भागात झालेल्या वीजयंत्रणेच्या नुकसानीचा आढावा तसेच राज्यभरातील वीजपुरवठ्याची स्थिती तसेच इतर विविध मुद्द्यांवर बैठक घेतली. यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. असीमकुमार गुप्ता, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश वाघमारे, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय खंदारे, एमएसईबी सुत्रधारी कंपनीचे सल्लागार श्री. उत्तमराव झाल्टे तसेच चारही वीज कंपन्यांचे संचालक उपस्थित होते.

ऊर्जामंत्री ना. डॉ. राऊत यांनी सांगितले की, कोविड-19 मुळे वीजक्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. वीजबिलांची वसुली अत्यंत कमी प्रमाणात होत आहे. एकीकडे महसुलात घट होताना दुसरीकडे ‘निसर्ग’ चक्रीवादळ, अवकाळी मुसळधार पाऊस व परतीच्या पावसाची अतिवृष्टी यामुळे यंदा राज्यभरातील वीजयंत्रणेला मोठे तडाखे बसले आहे. मात्र, या प्रतिकूल परिस्थितीतही वीजग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा व दर्जेदार ग्राहकसेवा देणे ही प्राथमिक जबाबदारी व कर्तव्य आहे.