राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे सुरू करण्यासाठी जयंत पाटील-धनंजय मुंडे दोन दिवस जिल्हावारीवर

राजकारण

जयपाल वाघमारे

नांदेड,बातमी24:- दमदार नेत्यांमुळे नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकवेळ मोठा दबदबा होता.मात्र मागच्या सात ते आठ वर्षांमध्ये पक्षाची पुरती वाताहत झाली. या वाताहतीमधील वात तेवत ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून ते पक्ष वाढीच्या दृष्टीने तालुका पातळीवर जाऊन पक्षाच्या पुनर्बांधणीचा प्रयत्न करणार आहेत.

जयंत पाटील व धनंजय मुंडे हे 26 व 27 जून रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौरा निश्चित झाला आहे. या दौऱ्याच्या अनुषंगाने राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागेल आहेत. दि.26 रोजी अहमदपूर येथून पाटील व मुंडे हे लोहा येथे सवा चार वाजता आगमन होणार असून येथे विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक, त्यानंतर जयंत पाटील हे जलसंपदा तर धनंजय मुंडे हे समाजकल्याण विभागाचा नांदेड येथे शासकीय विश्रामगृह येथे आढावा घेतील. दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहर भोसीकर यांच्या निवासस्थानी सकाळी साडे नऊ वाजता भेट देतील, पावणे अकरा वाजता पक्ष कार्यकारणी बैठक पाटील व मुंडे संयुक्तपणे घेणार आहेत.त्यानंतर नायगाव,मुखेड,देगलूर, हदगाव,माहूर मुक्काम व 28 रोजी सकाळी नऊ वाजता किनवट असा दौरा असणार आहे.

हा दौरा नांदेड जिल्ह्यातील बहुतांशी विधानसभा मतदारसंघात जाणार असून पक्ष बांधणी करण्याचा प्रयत्न होणार आहे.मात्र जिल्ह्यात पक्ष आस्तित्व आजघडीला नगण्य असून पक्षाला जिल्ह्यात बळ देईल असे नेतृत्वच पावरफुल नसल्यासारखी परिस्थिती आहे.पक्ष गटातटात विखुरलेला असल्याने पक्ष वाढीस पुढाकार घेणारा नेताच नाही.नवनियुक्त जिल्हाध्यक्ष हरिहर भोसीकर हे कॉंग्रेसच्या ताटाखालच्या मांजरासारखे वागतात. त्यामुळे जिल्हाध्यक्ष भोसीकर यांचा पक्ष वाढीस लाभ होईल असे दिसत नाही. जुनी मंडळी वयस्क झाल्याने राजकीय निवृत्तीमध्ये वावरत आहेत.अशा परिस्थितीत पाटील आणि मुंडे यांचा जम्बो दौरा पक्षाला फार उभारणी किंवा जाण फुकेल असे दिसत नाही.