नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी; नागरिकांना सतर्कतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन 

नांदेड

नांदेड,बातमी24 : नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासांमध्ये पावसाने जोर धरला असून अजूनही पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील २६ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थितीवर लक्ष ठेवून असून ज्या ठिकाणी मदतीची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी आवश्यक साधनसामुग्रीसह तैणात राहण्याची सूचना बचाव पथकांना केली आहे.

काल सकाळी दहा वाजता पासून रविवारी दहा वाजेपर्यंत जिल्ह्यातील 63 मंडळांपैकी 26 मंडळांमध्ये 65 मिली लिटर पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. किनवट सारख्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी नाल्यांच्या पाणीपात्रामध्ये वाढ झाली असून नागरिकांनी धोक्याच्या ठिकाणी जाणे टाळावे असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या पंचनामा पाऊस थांबल्यानंतर करण्यात यावा असे निर्देश प्रशासनाने दिले आहे.

जिल्ह्यामध्ये 24 तासात सर्वाधिक पाऊस किनवट तालुक्यात झाला आहे. दहा वाजेपर्यंत 136 मिलिमीटर पाऊस तालुक्यात झाला. तालुक्याच्या सिंदगी,उमरी बाजार व किनवट या मंडळात पावसाचा जोर अधिक आहे. किनवटपाठोपाठ हिमायतनगर, माहूर,हदगाव, भोकर, अर्धापूर, मुदखेड, या तालुक्यांमध्ये सध्या पाऊस जोरदार सुरू आहे. नागरिकांनी नाले, ओढे, तलावाच्या भागात जाण्याचे आज टाळावे असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.