लसीकरणासाठी सीईओ वर्षा ठाकूर पोहचल्या आदिवासी पाड्यावर;शक्ती नगरमध्ये शंभर टक्के लसीकरण

नांदेड

नांदेड,बातमी24:- कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात हर घर दस्तक मोहीम राबविण्यात येत असून आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी किनवट तालुक्यात दौरा केला. तालुक्यातील घोगदरवाडी अंतर्गत शिवशक्ती नगर या आदिवासी पाड्यावर त्यांनी रात्री सात वाजता भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. सीईओ ठाकूर यांनी लसीकरणा संदर्भात गावक-यांचे प्रबोधन केले. त्यानंतर नागरिक लसीकरणासाठी स्वतः होऊन पुढे आले. त्यामुळे शिवशक्ती नगर येथील 100% लसीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण झाले आहे.

जिल्ह्यात लसीकरणाची टक्केवारी वाढली पाहिजे,यासाठी हर घर दस्तक हे अभियान प्रशासनाच्या वतीने राबविले जात आहे.या मोहिमे अंतर्गत आदिवासी भाग असलेल्या किनवट तालुक्यातील नागरिकांचे लसीकरण झाले पाहिजे,यासाठी प्रशासनाकडून वाडी तांड्या पिंजून काढल्या जात आहे. लसीकरण मोहिमेला गती देण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर या आदिवासी भागाच्या वाडी- तांड्यावर पोहचल्या. काही गावातील पाडावर जाऊन त्यांनी आदिवासी महिला व बांधवांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लसीकरणाचे महत्व पटवून देत,गावकऱ्यांचे प्रबोधन केले,त्यामुळे शक्ती नगर येथे शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाले.

जलधारा, बोधडी व किनवट पंचायत समिती येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा लसीकरणा संदर्भात आढावा घेतला. यावेळी तहसीलदार मृणाल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, गट विकास अधिकारी सुभाष धनवे, गट शिक्षण अधिकारी अनिल महामुने आदींची उपस्थिती होती.