क्षयमुक्त गाव मोहिमेसाठी विकास आराखड्यात तरतूद;-सीईओ मीनल करनवाल

नांदेड

नांदेड,बातमी24- केंद्र शासनाच्या क्षयरोगमुक्त पंचायत मोहिमेची यशस्वीपणे अंमलबजावणीसाठी सबंध राज्यात मोहीम चालू आहे. केंद्र शासन आरोग्य विभाग व पंचायत राज विभाग यांच्या करारानुसार पंचायत राज संस्था व ग्रामपंचायत यांनी सदर मोहिमेत ग्रामपंचायत विकास आराखड्यांमध्ये क्षयरोग नियंत्रणासाठी निधीची तरतुदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ग्रामपंचायत विकास आराखड्यात तरतूद ठेवण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिले आहेत.
वर्ष 2024-25 चा ग्रामपंचायत विकास आराखडा बनविण्याचे काम गावस्तरावर सूरु आहे. यात टीबीमुक्त पंचायत उपक्रमासाठी तरतूद करण्याच्या सूचना गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत यांना देण्यात आल्या आहेत.
क्षयरोगाची कमी संख्या विचारात घेता छोट्या ग्रामपंचायतींनी रुपये 20 हजार तर मोठ्या ग्रामपंचायतींनी 50 हजार रुपयापर्यंतची तरतूद करावी. ज्यात क्षय रुग्णांना उपचार व तपासण्यांसाठींचा प्रवास खर्च, रुग्णांच्या थुंकीचे नमुने तपासणी, गावस्तरावर प्रचार प्रसिद्धी, बॅनर्स व पोस्टर स्पर्धांचे आयोजन तसेच रुग्णांना अतिरिक्त पोषण आहारासाठी आर्थिक मदत तसेच रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना सामाजिक सहाय्य योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे.
वरील सर्व बाबीचे प्रशिक्षण जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे-जाधव यांनी यशदा पुणे येथून पूर्ण केलेले असून अंमलबजावणीसाठी तत्परतेने कार्य करण्याच्या उद्येशाने योग्य त्या बैठकाही घेतलेल्या आहेत. यावर्षी किमान शंभर गावे क्षयमुक्त करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी वर्गास योग्य ते मार्गदर्शन केले असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी यांना अंमलबजावणीसाठी तत्पर राहण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिल्या.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे यांनी सांगितले की, वरील प्रकारचे उपक्रम महाराष्ट्रात सर्वप्रथम नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येणार असून यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. तसेच यापूर्वी क्षयरोग मोहिमेत नांदेड जिल्ह्याचे राज्यात प्रभावी ठरले होते. आता ही मोहीम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागासह नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे-जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बालाजी शिंदे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड यांनी केले आहे.