खा.चिखलीकर यांचे निवेदने तसेच पत्रव्यवहार मुख्यमंत्र्यांऐवजी उपमुख्यमंत्र्यांकडे

राजकारण

नांदेड, बातमी24ः बहुतांशी राजकीय पक्षाचा कोरम पूर्ण करून भाजपवासी व नंतर याच पक्षाचे खासदार झालेल्या प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडून मागण्यांसंबंधी निवेदने हे मुख्यमंत्र्यांना न देता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठविले जात आहे. उपमुख्यमंत्रीपद हे घटनात्मक नसले, तरी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करून उपयोगी नसल्याची जाण खा. चिखलीकर यांना असावी, त्यामुळे निवेदन पत्र उपमुख्यमंत्र्यांचे नावे ते देत असावेत.

नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात अशोक चव्हाण यांच्यानंतर प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नावाचा मोठा दबदबा आहे. अशोक चव्हाण यांचे कट्टर विरोधक अशी राज्याला ओळख होय. गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा पराभव करून चिखलीकर यांनी संसदेचे दार ठोठावले. राज्यातील भाजपच्या सत्तेचा डाव शिवसेना, राष्ट्रवादी व काँगेसने उधळून लावला.नाइलाजास्तव भाजप विरोधी बाकावर बसावे लागले. राज्यातील भाजप नेत्यांच्या मनसुब्यांवर पाणी फे रले गेले.

हाती चालून आलेली सत्ता गेल्याने भाजप नेत्यांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडून प्रकर्षाने जाणवू लागते. त्यामुळे एखादा आंदोलनासंबंधी निवेदन असो, किंवा शासनाकडे करावायाच्या पत्रव्यवहारासंबंधी ते मुख्यमंत्र्यांना पत्र किंवा निवेदन न देता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देत असतात.

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी पंचविस हजार रुपयांची मदत देण्याची मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे पाठविले आहे. यासंबंधी राज्य सरकारने तात्काळ शेतकर्‍यांना मदत करण्याची मागणी केली. यापूर्वी सुद्धा खा.चिखलीकर यांनी महाआघाडी सरकारच्या काळात वेगवेगळया मागणी व निवेदनासंबंधी अजित पवार यांच्याकडे पत्रव्यवहार केल्याचे समोर आले आहे.