घरात राहूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे: राहूल प्रधान

नांदेड

नांदेड, बातमी24ः-एप्रिल महिना आला की सर्वांच्या आनंदास उधाण आलेले असते. कारण, याच महिन्यात क्रांतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या सर्वोच्च सणाची आपण वर्षभर वाट पाहत असतो. मागील वर्षापासून या उत्सवात खंड पडला. निमित्त होते कोरोनाचे. वर्ष 2020 साली कडक लॉकडाऊन होता. प्रत्येकाने आपापल्या राहत्या ठिकाणाहून जयंती साजरी केली. यंदाही तशीच कोरोनाची परिस्थिती असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रत्येकाने घरो-घरीच साजरी करावी, असे आवाहन आझाद समाज पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष राहूल प्रधान यांनी केले.

कोरोना विषाणूचे नवे म्यूटेशन तयार होऊन त्याचा संसर्ग मागील वर्षापेक्षाही अधिक वेगाने पसरू लागला. आज त्यामुळेच जी काही स्थिती ओढावली आहे.राज्यात प्रत्येक ठिकाणी लसींचा, रेमडिसीवर औषध आणि रुग्णालयांत बेड्सचा तुटवडा आहे.

आंबेडकरी चळवळीतील युवक हा प्रचंड संयमी आहे. पण त्याचवेळेस तो स्वतःच्या अस्मितेबाबत प्रचंड जागरूक आणि संवेदनशील देखील आहे. फुले-आंबेडकर जयंती तर प्रचंड जिव्हाळ्याचा विषय. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी सार्वजनिक पातळीवर जयंती साजरी न करणे योग्य राहिल, असे राहूल प्रधान यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले.

आज राज्यभरातील शेकडो जयंती उत्सव मंडळांसोबत थेट संवादानंतर सर्वजण समन्वयाच्या भूमिकेत आहेत. मागील 15 दिवसांपूर्वी मी स्वतः शासन घालून देईल, त्या नियमांच्या अधीन राहून जयंती साजरी करावी आणि शासनानेही आम्हाला तशी रितसर परवानगी द्यावी. त्या परवानगीनुसारच आपण जयंती साजरी करूयात, या भूमिकेत मी होतो. परंतू आताच्या घडीला समुहाने एकत्र येऊन जयंती साजरी करणे शक्यच नाही आणि ते आपल्याला कदापीही परवडणारे नसल्याचे त्यांनी सांगितले.

जयंतीनिमित्त वेग वेगळे मत प्रवाह समोर येत आहेत. खास करून तरुण पिढी जल्लोषात जयंती साजरी करण्यासाठी उत्साही असल्याचे दिसून येत आहे. परंतू उत्साही तरुण मित्रांनी हे समजून घेतले पाहिजे की, जयंतीनिमित्त प्रत्येक घरातून जन्मलेल्या लेकरापासून ते हातात काठी घेऊन चालणारी म्हातारी माणसं हे सर्व जण बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात. मग अशा परिस्थितीत आपण मिरवणूक काढण्याची भूमिका घेणे, योग्य नाही, अस राहूल प्रधान यांनी सांगितले.