दोन लस असेल तर शिधापत्रिकाधारकांना प्रथम प्राधान्य;जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांचा महत्वपूर्ण निर्णय

नांदेड

नांदेड,बातमी24 :- राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन जनजीवन पूर्वरत करण्याच्यादृष्टिने अटी व शर्तीच्या अधिन राहून शाळा, मंदिरे, प्रार्थनास्थळ खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे व येत्या काळात असलेल्या विविध सण व उत्सवामुळे होणारी गर्दी आणि यामुळे वाढू शकणारा संसर्गाचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारक लाभार्थी यांना कोरोना लसीच्या अटी व शर्तीच्या अधिन राहून प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.

जिल्ह्यातील सर्व स्वस्तधान्य दुकानांवर यापुढे ज्या शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी कोरोना लसीचे दोन डोस पूर्ण केले आहे अशाच लाभार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. यात जनतेच्या आरोग्याला अधिक प्राधान्य देऊन संभाव्य धोका  व कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी हे आदेश परिपत्रकान्वये निर्गमीत केले आहेत. लाभार्थ्यांसह जनतेनेही लसीकरणासाठी अधिकाधिक उत्स्फुर्त सहभाग यात घ्यावा, असेही स्पष्ट केले आहे. ज्या व्यक्तींनी लसीचा एक डोस घेतला आहे त्यांना दोन डोस घेतलेल्या लाभार्थ्यांनंतर प्राधान्य दिले जाईल हेही स्पष्ट केले आहे.