ग्राहक समाधानासाठी महावितरण कटिबद्ध- उर्जामंत्री नितीन राऊत

महाराष्ट्र

जयपाल वाघमारे
नांदेड, बातमी24ः- टाळेबंदीच्या कालावधीमध्ये ग्राहकांनी वीजेच्या वापरासंबंधी प्रत्यक्ष रिडींग घेतल्यानंतर संगणकीकृत बिलिंग प्रणालीद्वारे एप्रिल, मे व जून महिन्याचे देण्यात आलेल्या बिलासंबंधी ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ग्राहकांचा संभ्रम व शंकाचे निरासरण करण्यासाठी महावितरण कटिबद्ध या संकल्पनेवर आधारीत शासन आपल्या दारी हे अभियान राज्यभर शहरी व ग्रामीण भागात राबविण्यात येणार असल्याचे राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी कळविले.

वीज ग्राहकांना वीजबिलासंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. जो काही विजेच्या वापर झाला आहे. त्याच अनुषंगाने ग्राहकांना बिल आकारण्यात आले आहे. या काळात अखंडित वीज पुरवठा केला गेला. या काळात कडक उन्हाळा तसेच सर्वच मंडळी घरात राहिल्याने वीजेचा वापर अधिक झालेला आहे. यात कुठेही वाढीव बिल देण्यात आलेले नसून कदाचित तशा तक्रारी असतील, तर त्यासंबंधी तक्रार निवारण कक्ष उभारण्यात आला आहे. याउपर रिडींग चुकीची असल्यास त्यात दुरुस्त करून देण्याच्या सूचना यंत्रणेला देण्यात आलेल्या आहेत, असे डॉ. राऊत यांनी सांगितले.

ग्राहकांचे समाधान होणे महत्वाचे असून ग्राहक समाधानासाठी महावितरण कटिबंध या अभियानातून ग्राहकांशी थेट संवाद साधला जाणार आहे. यासाठी शहरी भागातील मोक्याचे ठिकाण तसेच ग्रामीण भागात आठवडी बाजाराच्या ठिकाणी ग्राहकांचे विशेष शिबीर व ग्राहक मेळावे हे सोमवार दि. 29 जून पासून घेण्यात येणार आहेत. तसे राज्यातील प्रत्येक परिमंडळाअंतर्गत येणार्‍या कार्यालयांना नियोजन करून शिबिरे व मेळावे घेण्याबाबत निर्देशित केले आहे. अशी माहिती डॉ. राऊत यांनी दिली.
——
केंद्राकडे निधीची मागणी करणार- डॉ. राऊत
टाळेबंदीच्या काळात वीज ग्राहकांना अखंडितपणे अवितरत सेवा देण्याचे काम महावितरणकडून करण्यात आलेले आहे. सेवा दर्जेदार दिल्यानंतर वीज बिल भरणा तुटपुंजा ठरत आहे. वीजग्राहकांना सवलत देण्यासंबंधी निधीचा तुटवडा पडत आहे. यासाठी राज्य सरकारकडून केंद्राकडे निधीची मागणी केली जाणार असल्याचे डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.