अतिवृष्टीचे तात्काळ पंचनामे करा – खा. चिखलीकर

नांदेड

नांदेड,बातमी24:- एकीकडे कोरोना महामारी तर दुसरीकडे जिल्हयात पडलेला ढगफुटी सदृश्य पाऊस तसेच झालेली अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती तसेच घर पडझडीच्या नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावे अशा सुचना नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केल्या आहेत.

मागील आठवडयापासुन जिल्हयात पावसाने थैमान घातले आहे जिल्हयाच्या बहुतांश भागात अतिवृष्टी झाल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी
अधिच संकटात सापडला
असुन जनावरांना लंपी आजारामुळे शेतकरी हतबल झाला आहे. लंपी आजारामुळे लाखोची जनावरे वाचविण्यात शेतक-यांची तारेवरची कसरत होत आहे.यामुळे शेतकरी हा चारही बाजुने संकटात सापडला आहे.
बिलोली, देगलूर,मुखेड, धर्माबाद या तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे घरांच्या पडझडीसह शेतक-यांच्या हाता-तोंडाशी आलेले मुग, उडीद, सोयाबीन यासह अन्य पीके उध्दवस्त झाली आहेत मुखेड तालुक्यातील बेनाळ येथील पाझर तलाव फुटल्यामुळे पाझर तलाव क्षेत्राखालील शेतक-यांच्या जमिनी खरडल्या गेल्या आहेत, जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे धर्माबाद तालुक्यातील करखेली सह जिल्हयाच्या अन्य भागात नागरीकांच्या घरांची पडझड झाली आहे.

अतिवृष्टीमुळे जिल्हयातील शेतीचे, पिकांचे घरांचे मोठे नुकसान झाले असुन प्रशासनाने नुकसान झालेल्या शेती, घराचे तात्काळ पंचनाने करुन आर्थिक मदत द्यावी अशा सुचना खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिल्या आहेत.