मृत्यूच्या आकडयात पुन्हा घोळ; देगलूरच्या मयताची नोंदच नव्हे

नांदेड

नांदेड, बातमी24ः कोरोनाच्या आकडयाबाबत सुरुवातीपासून मोठा घोळ सुरु आहे. आता मयताचे आकडेवारीत प्रशासनाकडून घोळ सुरु झाला आहे. मृत्यू कोरोनामुळे झाला असेल, तर तशी नोंद प्रशासनाने घेणे अपेक्षीत असते. मात्र देगलूर येथे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाची प्रेसनोटमध्ये नोंदच घेण्यात आलेली नाही. एकाप्रकारे मृत्यांची माहिती लपविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून चालला आहे काय ? असा प्रश्न पुन्हा निर्माण होत आहे.

देगलूर येथील सत्यम नगर भागात राहणारे ऑडिट कार्यालयातील सब ऑडिटर असलेल्या प्रकाश तुळीराम मानेकर यांचा कोरोनाचा अहवाल दि. 20 जुलै रोजी पॉझिटीव्ह आला होता. प्रकृतीगंभीर असल्याने विष्णपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दि. 23 जुलै रोजी मृत्यू झाला. मयताची पत्नी व मुलगा हे दोघे ही कोरोना पॉझिटीव्ह आलेले असून ते यात्री निवास येथे उपचार घेत आहेत.

मयतावर मनपाच्या वतीने गोवर्धन घाट येथे दोन नातेवाईकांच्या साक्षीने अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. दि. 23 तारखेच्या प्रेसनोटमध्ये नोंद नाही, 24 तारखेच्या प्रेसनोटमध्ये नोंद होईल, असे अपेक्षीत होते. तसेही झाले. मागच्या तीन ते चार दिवसांमध्ये प्रशासनाने प्रेसनोटमध्ये नोंद घेतली नाही. नोंद न घेण्याचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. आकडेवारी लपवून प्रशासन नेमके काय साध्य करू पाहत आहे, असा प्रश्न सामान्यांमधून व्यक्त होत आहे.
——-
जिल्हाधिकारी आपण तरी लक्ष घाला

सुरुवातीपासून कोरेानाच्या बाबतीत प्रशासनाचे नियोजन अपयशी ठरत आले आहे. रुग्णांच्या दिल्या जाणार्‍या प्रेसनोटबद्दल असंख्य चूका असतात. माहिती अपूर्ण असते. इतपत ठीक आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची सुद्धा प्रशासनाकडून माहिती लपविली जात असेल तर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे लक्ष आहे कुठे, असा सवाल व्यक्त होत, असून आरोग्य प्रशासन जिल्हाधिकार्‍यांनाच  तरी अंधारात ठेवत नसेल ना असे सामान्यांना वाटू लागले आहे.