बदली प्रक्रियेबाबत कर्मचाऱ्यांमधून समाधान;पदाधिकाऱ्यांनी दिली प्रशासनास साथ

नांदेड

 

नांदेड, बातमी24:-प्रत्येक वर्षी बदल्यांचा मोठा बाजार जिल्हा परिषदमध्ये भरत असतो.मात्र गत वर्षीपासून कोरोनामुळे पूर्ण क्षमतेने बदल्या होत नसल्या तरी;शासनाने ठरवून दिलेल्या पंधरा टक्के या प्रमाणे बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.मात्र यावेळी पदाधिकारी मंडळींनी पारदर्शकता स्वीकारल्याने प्रशासनाची फारशी डोकेदुखी झाली नाही.त्यातली त्यात सीईओ वर्षा ठाकूर यांनी कडक धोरण राबविल्याने कुणावर ही अन्याय झाला नाही.त्यामुळे कर्मचारी वर्गामधून समाधान व्यक्त होत आहे.

जिल्हा परिषदमध्ये सोमवारपासून बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली.सर्व विभागांच्या मिळून जवळपास चारशे बदल्या झाल्या. यात पेसा अंतर्गत रिक्त अनुशेष भरून काढण्याचा काटेकोरपणे प्रयत्न झाला.जे कर्मचारी वर्षानुवर्षे जिल्हा परिषद मुख्य इमारतीमधुन हलायला तयार नव्हते, आशा कर्मचारी यांना यावेळी जिल्हा परिषद मधील खुर्ची सोडावी लागणार असून तालुका स्तरावर जावे लागणार आहे.यात काही कक्षाधिकारी व कर्मचारी यांनी खुर्चीचा सातबारा काढला असावा,असा तोरा मिरवीत होते.अशाचे चेहरे किनवट व माहूरला जावे लागणार असल्याने हिरमुसले आहेत. असे बोटावर मोजण्याइतके कर्मचारी,विस्तार अधिकारी तथा कक्षाधिकारी वगळता जवळपास 95 टक्के बदली झालेले कर्मचारी हे नियमाप्रमाणे बदली झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत आहेत.

बदली प्रक्रियेत कुठे अनियमितता न झाल्यामुळे बदल्यांच्या आडून चालणारा लाखो रुपयांचा घोडेबाजार यावेळी थांबला आहे. यात पदाधिकारी यांच्याशी संगनमत करून हात साफ करणाऱ्या काही अधिकारी यांच्या हाताला यावेळी काही न लागल्यामुळे नाराज झाले असावेत.मात्र नियम म्हणजे नियम तो सर्वांना समान हे सूत्र सीईओ ठाकूर यांनी पाळल्यामुळे कोणत्या ही कर्मचारी संघटना यांना दबावाची भाषा प्रशासनावर करता आली नाही.प्रत्येक वेळी प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी सभागृहात बसणाऱ्या संघटना नेत्यांना यावेळी प्रथमच बदल्याबाबत बाहेरून कानोसा घ्यावा लागला.उलट संघटना पदाधिकारी मंडळींनी प्रशासनास सहकार्य करत या निमित्ताने चांगला संदेश दिला. ही प्रशासनाच्या दृष्टीने जमेची बाजू म्हणावी लागेल.याचसोबत कौतुक करावे लागेल ते जिल्हा सत्ताधारी सर्व पदाधिकारी यांचे होय,कुठलाही माफक चार दोन मिळण्याचा न उद्देश ठेवल्याने बदलीच्या निमीत्ताने बाहेर जाणाऱ्या कर्मचारी यांची फारशी चालली नाही. त्यामुळे यावर्षी झालेल्या बदल्यांची प्रक्रिया प्रशासकीय दृष्ट्या कमालीची सकारात्मक अशीच म्हणावी लागणार आहे. यात जिल्हा परिषद अध्यक्ष मंगराणी अंबुलगेकर व सीईओ वर्षा ठाकूर यांच्याबद्दल कर्मचारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.