योजनांचे लाभधारकांसाठी शासन आपल्या दारी”- जिल्हाधिकारी  बोरगांवकर

नांदेड

नांदेड,बातमी. 24 :- “शासन आपल्या दारी” हे अभियान शासकीय योजनांच्या लाभधारकांचे मनोबल, आत्मविश्वास आणि शासकीय योजनांप्रती सकारात्मकता निर्माण करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील सर्व विभागाच्या प्रमुखांनी आपल्या विभागांतर्गत असलेल्या योजना अधिकाधिक सकारात्मक भावनेने पोहोचविण्यासाठी कटिबध्द असले पाहीजे. या अभियानाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रस्तावित दौरा व इतर मान्यवरांची उपस्थिती लक्षात घेता सर्व विभागप्रमुखांनी मिशन मोडवर येऊन काम करावे, असे आवाहन प्र. जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी केले.

“शासन आपल्या दारी” या अभियानानिमित्त आज येथील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन भवन येथे अधिकाऱ्यांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अपर पोलीस अधीक्षक अबिनेश कुमार, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता गजेंद्र राजपूत, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

या अभियानाच्या निमित्ताने प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने वाहन परवाना शिबीर, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळावा, आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक तपासणी शिबीर, कृषी विभागाच्या वतीने प्रगतशील शेतकऱ्यांचे आपल्या गुणवत्तापूर्ण उत्पादनाबाबतचे स्टॉल्स, महिला बचतगटांच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांचे स्टॉल्स यााबाबत बैठकीत प्र. जिल्हाधिकारी बोरगावकर यांनी निर्देश दिले.