एमजीएम विद्यापीठ गीताचे थाटात लोकार्पण

महाराष्ट्र

औरंगाबाद,बातमी24:-
मी 50 वर्षांपासून संगीतक्षेत्रात कार्यरत आहे. खूप गाणी गायली पण, काही क्षण खूप प्रेरणादायी असतात आणि आजचा एमजीएम विद्यापीठ गीत लोकार्पणाचा क्षणही त्यापैकीच एक आहे. कारण, एमजीएम विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांचे हजारो विद्यार्थी शिकत आहेत, पुढेही शिकतील. अशा हजारो विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरेल, असे विद्यापीठ गीत मी गायले ही भावना माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. आगामी पिढ्यांसाठी हे गीत आणि एमजीएम विद्यापीठ कायम प्रेरक राहो, अशा शब्दांत ज्येष्ठ पार्श्वगायिका कविता कृष्णमूर्ती यांनी भावना व्यक्त केल्या. एमजीएम विद्यापीठ गीताच्या लोकार्पणप्रसंगी त्या बोलत होत्या.

या वेळी गीतकार संजय मोहोड, मुक्ता भिडे, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, विश्वस्त प्रतापराव बोराडे, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे, एमजीएम वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सुर्यवंशी, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, रणजीत कक्कड आदी उपस्थित होते. ‘अप्पो दीप भव’ हे एमजीएम विद्यापीठाचे घोषवाक्य असून याच धर्तीवर प्रसिद्ध गीतकार संजय मोहोड यांनी विद्यापीठ गीताची रचना केली आहे. तर कविता कृष्णमूर्ती यांनी स्वरबद्ध आणि दिवंगत संगीतकार नरेंद्र भीडे यांनी संगीतबद्ध केले आहे.

ऑनलाईन पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमात गीतकार प्रा. संजय मोहोड म्हणाले, गौतम बुद्ध, गुरुनानक, संत कबीर, महावीरांसारख्या संतांनी तर आईन्स्टाईनसारख्या विचारवंत आणि शास्त्रज्ञांनी त्यांची मांडणी विशिष्ट सुत्रात केली. सुत्र हे संक्षिप्त असले तरी ते मार्गदर्शक असते. नेमका हाच धागा पकडून एमजीएम विद्यापीठ गीताचे सुत्र बांधण्यात आले. ‘प्रत्येकाने स्वयंप्रकाशित होऊन इतरांना प्रकाशित करावे. तू स्वरुप तर आहेसच पण तुला जगाचे रुपही बघायचे आहे आणि ते रुप तुझ्यातच विराजित आहे. त्यामुळे या आंतरपरस्पर राहून तु समाजाचे भले कर. जगातील संपूर्ण ज्ञान देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आणि त्या ज्ञानाचा लाभ तू घे. हे सर्व काही घडल्यास सर्वांचे कल्याण होईल. समाजाचे कल्याण असलेला पथदर्शक तुला व्हायचे आहे,’ असा या गीताचा अर्थ असल्याचेही प्रा. मोहोड यांनी सांगितले.

 

कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे म्हणाले, एमजीएम विद्यापीठाच्या गीताचा लोकार्पण सोहळा हा एक ऐतिहासिक क्षण आहे. कारण, विद्यापीठात अनेक पिढ्या येतात आणि त्या पिढ्यांपर्यंत विद्यापीठाची मुल्ये, तत्वज्ञान, विचार, दिशा पोहोचवण्याचे काम विद्यापीठ गीतातून होते. ‘अत: दीप भव’ हा केवळ विचार नव्हे तर तत्वज्ञान आणि दिशा असून यास कविता कृष्णमूर्तींचे स्वर लाभणे गौरवशाली आहे. त्यामुळे एमजीएम विद्यापीठात येणाऱ्या भावी सर्व पिढ्यांकडून या गीताच्या निर्मितीमागे झटणाऱ्या हातांचे मी आभार मानतो. दरम्यान, या कार्यक्रमास एमजीएमचे प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि अन्य अनेक लोक उपस्थित होते. एमजीएम रेडिओचे प्रमुख देवाशिष शेडगे यांनी सूत्रसंचालन केले.