जिल्हा नियोजन बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांना शॉक तर ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणेची धुलाई

नांदेड

जयपाल वाघमारे

नांदेड,बातमी24:-जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या बैठकीत आमदार-खासदार मंडळींनी जिल्ह्यातील काही विभागाच्या अधिकाऱ्यांची विकेट काढत इशारा देण्याचा प्रयत्न केला.यात महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलाच शॉक दिला तर जलजीवनच्या कामावरून कार्यकारी अभियंता पाटील यांची धुलाई केली.यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यामधील जिल्ह्याच्या विकासासंबंधी समनव्य दिलासा देणारा ठरला.

राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा नियोजन समितीची बबैठक शुक्रवार दि.4 नोव्हेंबर राजी शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे पार पडली. या बैठकीस माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा सदस्य अशोक चव्हाण, खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, खासदार सुधाकर श्रृंगारे, आमदार अमर राजूरकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार माधवराव पाटील जवळगावकर,  आमदार तुषार राठोड, आमदार भिमराव केराम, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार डॉ. राजेश पवार, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, आमदार शामसुंदर शिंदे, आमदार जितेश अंतापूरकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले, देगलूरच्या सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा, मनपा आयुक्त सुनिल लहाने, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे व संबंधित सर्व विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

यावेळी आमदार मंडळी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर तुटून पडले.महावितरणचे अधिकारी हे आमदार-खासदर यांचे कामे सांगून ही ऐकत नाहीत. डीपीचे प्रश्न गावोगावी ते सोडवू शकत नसल्याने अडचणीत येत आहेत. कामे न करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई केली,जावी अशी मागणी आ.तुषार राठोड, आ.राजेश पवार,खासदार हेमंत पाटील यांनी केली.यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना दम देत विना तक्रार कामे करण्याचे आदेश दिले.
आमदारांनी महावितरणनंतर जलजीवन मिशनकडे मोर्चा वळवत या विभागाकडून कामे बोगस होत असल्याचा सांगत अधिकारी हे गुत्तेदारासोबत संगनमत करून निकृष्ट काम करत असल्याचं खासदार हेमंत पाटील यांनी आरोप केला.यावेळी जलजीवनच्या पाईप निकृष्ट वापरत असल्याचा मुद्दा राठोड यांनी लावून धरला तर कामाचे क्लब टेंडर करून मोनोपल्ली चालवत असल्याच सांगत लक्ष वेधून घेतलं.
——-
खासदर चिखलीकर यांच्याकडून काँग्रेसला लक्ष
खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शहरात लागलेल्या बॅनरवरून काँग्रेसला लक्ष करण्याचा प्रयत्न केला. यावेळी चिखलीकर यांनी मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने यांना धारेवर धरत शहरातील बॅनर कधी हटणार असा खडा सवाल करत कारवाईची मागणी केली.यावर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सौम्य प्रतिक्रिया नोंदवित नियमात नसलेले बॅनर काढण्याचे आदेश दिले.
———
खपले नामक अधिकाऱ्याचा खपल्या काढल्या जातात तेव्हा…
जात पडताळणी समितीचे अध्यक्ष खपले हे बैठकीस उशिरा आल्याने चिखलीकर यांनी खपले यांचा सत्कार केला जावा,असे सांगत त्यांचे कान उपटले.या यावेळी खपले यांच्यावर इतर आमदार व खासदार ही आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले.